आमचे युतीबाबत ठरल्याने इतरांनी तोंड घालू नये

आमचे युतीबाबत ठरल्याने इतरांनी तोंड घालू नये

मुंबई नगरी टीम

मुंबई  :  मुख्यमंत्री भाजपचाच होणार या गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे असल्याने इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये असा टोला लगावला आहे.

  पत्रकारानी गिरीश महाजन यांच्या मुख्यमंत्री भाजपचाच होणार या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता ते बोलत होते.शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत , ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे , ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का , उज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरीबांना मिळाला , गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का , शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का , शेतकरी कर्जमुक्त झाला का या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे . शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमधे आहे. शेतकऱ्यांनी आपली दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे , आता त्यांची दुःख दूर करणे हे आपले कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे वक्तव्य महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांनीही आज केले आहे.  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांची बैठक वसंत स्मृती येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या भाषणात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असे  सरोज पांडे यांनी सांगितले . गिरिश महाजन आणि सरोज पांडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून जुंपल्याचे चित्र आहे.

Previous articleमी दलित पँथरचा पँथर असल्याने “ पँथरलाच” दत्तक घेतले
Next articleविधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची “विकास यात्रा”