भाजपा शरद पवारांना संपवण्याचे काम करतंय
मुंबई नगरी टीम
लातूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, जाणते राजे आहेत. गेले पाच वर्षे भाजपने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शेतकऱ्यांच्या नेत्यांना म्हणजेच साहेबांना संपवण्यासाठी काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
लातूर येथे मुक्ताई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार आज त्यांच्या जीवा-भावातल्या लातूरला भेट दिली. मला देव माहिती नाही पण देव माणूस मी पाहिला आहे. लातूर आणि पवारांचे एक वेगळे नाते आहे. लातूरला निसर्ग कोपला. भूकंपामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हा देवाने या देव माणसाला लातूरमध्ये पाठवले असे मुंडे म्हणाले.
महाराष्ट्राच्या मातीत येऊन भाजपच्या अध्यक्षांनी डंका पिटवू नये, आमच्या दैवताबद्दल एकही वाईट शब्द आम्ही एेकून घेणार नाही. ९३ साली जेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा पवारांनी त्या दंगली शांत करण्याची जबाबदारी पेलली. तुम्ही तर गुजारतमध्ये दंगली घडविण्याचे काम केले, असा आरोप मुंडे यांनी केला.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्वराज्यात येऊन आमच्या राजाचा अपमान केला. आम्ही भाजपचे विचार या पुरोगामी महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहोत. तुमच्या ईडी बिडीची आम्हाला भीती नाही, असे ठणकावले.
छत्रपतींच्या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा आहे. आमच्या छत्रपतींचे वंशज दिल्लीत गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी देशाच्या पंतप्रधानांनी यायला हवे होते. मात्र ज्यांची पत नाही त्यांनी छत्रपतींच्या वारसांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजप छत्रपतींची अस्मिता पूसून टाकण्याचं पाप करतंय असे ते म्हणाले.
आमच्या बहिणाबाई काल म्हणाल्या की राष्ट्रवादी संपली. अहो ज्या शहरात तुम्ही राहता तिथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. परळीचा आमदारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार असा विश्वास व्यक्त त्यांनी केला.