सत्तेत असताना शेतक-यांना मदत का केला नाही : जयंत पाटील

सत्तेत असताना शेतक-यांना मदत का केला नाही : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

नागपुर : अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले तेव्हा राज्यात भाजपाचे सरकार .सत्तेवर होते आज शेतकऱ्यांसाठी सभागृहात गळे काढणाऱ्यांना सत्तेत असतांना शेतकऱ्यांना मदत करण्यापासून कोणी अडवले होते असा सवाल  अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला.यांना एवढा पुळका आला असेल तर राज्याने केंद्राकडे १४ हजार ६०० कोटींची जी मागणी केली आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमच्यासोबत यावे असा टोलाही त्यांनी लगावला.

विधानसभेत आज विरोधकांनी अवकाळी पावसामुळे नुकसान आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीवरून प्रचंड घोषणाबाजी करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधकांनी सभागृहात केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातारवण होते.राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या गोंधळातच विरोधकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.विरोधकांचा हा केवळ कांगावा असल्याचा आरोप त्यांनी केला.राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी राज्याने ६ हजार ६०० कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत.तर केंद्राकडे मदतीसाठी १४ हजार ६०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडून मदतीचे वाटप सुरू असून,मंजूर केलेल्या ६६०० कोटी रुपयांपैकी २१०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत करण्यात आले आहेत. राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७४०० कोटी रूपये तर अवकाळीग्रस्त  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७२०० कोटी रुपये अशी एकूण १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यामुळे  विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांकडे आमच्याबरोबर येऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी मिळेल त्याकडे पहावे, येथे कांगावा करण्याचे नाटक करु नये असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना  लगावला.

Previous articleभाजप शिवसेना आमदारामध्ये धक्काबुक्की
Next article“पोर्न” संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मागणी