ठाकरे सरकार पाडण्यात रस नाही; फडणवीसांनी घेतली मोदी शहांची भेट

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : राजस्थानातील अस्थिर राजकिय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेवून राज्यातील विविध प्रश्नावंर चर्चा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले असतानाच,या भेटीत कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता.राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. शेतक-यांच्या समस्यांसंदर्भात याभेटीत चर्चा झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

राजस्थानातील राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या ऑक्टोंबर मध्ये अस्थिर केले जाणार असल्याची चर्चा असतानाच आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेवून चर्चा केल्याने फडणवीस यांच्या या भेटी काय चर्चा झाली याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील,रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख हे भाजपचे नेते उपस्थित होते.मात्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी ते एकटे गेल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.या भेटीत कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता.राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. शेतक-यांच्या समस्यांसंदर्भात यावेळी चर्चा केली असे फडणवीस यांनी शहा यांच्या भेटीनंतर सांगितले.

शेतक-यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर करण्यात आले.या भेटींच्यावेळी हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक,जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतक-यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योग सुद्धा चालला पाहिजे, या उद्देशातून साखर उद्योगातील अडचणी आज आम्ही अमित शाह यांच्यापुढे मांडल्या. साखर उद्योगांना पॅकेज द्यायला हवे, अशी मागणी केली. एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन अशा अनेक मागण्या आम्ही केल्या. केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. शेतक-यांना एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील कोरोना स्थितीसंदर्भात माहिती सुद्धा त्यांना दिली.या भेटीत कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता.शाह हे देशाचे गृहमंत्री असल्याने महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांतील कोरोनाच्या स्थितीवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. हे खरे आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. तुमची भाजपाच्या संसदीय समितीवर निवड झाली आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारिणी अजून तयार झाली नाही.आधी कार्यकारिणी तयार होईल, नंतर संसदीय बोर्ड तयार होईल. तसेही संसदीय बोर्डात कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय आमचे अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील. अद्याप कोणतीही नियुक्ती झालेली नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleशेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असे समजताच शांत !
Next articleआशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ  १ जुलैपासून मिळणार