अमृता फडणवीसांना कंगनाचा पुळका म्हणाल्या,पोस्टरला चपलांनी मारणे योग्य नाही!

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत ही एकापेक्षा एक वादग्रस्त विधाने करत आहे.त्यात ती महाराष्ट्रासह, मुंबई आणि शिवसेनेच्या नेत्यांवरही टीका करत आहे.त्यामुळे कंगनाच्या या विधानांवर शिवसेना आक्रमक झाली असून सेनेच्या महिला कार्यकत्यांनी तिच्याविरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे कंगनाच्या या वागणुकीवर सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मात्र कंगनाची पाठराख केली आहे. अमृता यांनी ट्वीट करत या सर्व घडामोडीवर नाराजी व्यक्त करत कंगनाची पाठराख केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अमृता यांना कंगनाचा इतका पुळका का?, असा प्रश्न आता सामान्यांकडून विचारला जात आहे.

आपल्याला एखाद्याचे म्हणणे पटू शकत नाही.मात्र लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे.बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे योग्य नाही”, असे ट्वीट अमृता यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केले आहे.दरम्यान, अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी बोलताना अमृता फडणवीस यांनी देखील मुंबईत राहणे सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांचा खरपूस समाचारही घेतला होता.

कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची उघड धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाच्या अशा एकापेक्षा एक वादग्रस्त ट्विटमुळे शिवसेनेच्या महिला कार्यकत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कंगनाचे पुतळे जाळून तिच्या पोस्टरवर चप्पलांचा चोप देत निषेध व्यक्त करण्यात आला होता. यावरूनच अमृता यांनी ट्वीट करत कंगनाची एकप्रकारे पाठराखण केली असल्याचे बोलले जात आहे.

Previous articleमी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला
Next articleशिवसेना इतकी निर्बुद्ध नाही,कंगना प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर मनसेचा सवाल