मुंबई नगरी टीम
मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयने दिल्यानंतर आदेशानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.यानिर्णयामुळे मुंबई मेट्रोच्या निर्णयात खरे तर मुख्यमंत्र्यांनीच मिठाचा खडा टाकला असल्याची टीका करीत कांजूरला कारशेड नेले तरी आरे येथे काम करावेच लागणार आहे.जर तेथे बांधकाम करायचेच आहे,तर मग आरे येथे कारशेड नाही, हा हट्ट क ? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयने दिले आहेत.या निर्णयावरून विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट असून,आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही.कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे.तेथे काम केले तर २०२१ पर्यंत आपण मुंबईकरांना मेट्रो देऊ शकतो.त्यामुळे अहंकार सोडून तेथे तत्काळ काम सुरू करावे असे सांगतानाच,आम्ही कोणतीही टीका करणार नाही असे फडणवीस म्हणाले. काही अधिका-यांच्या हे लक्षात आले की, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अहंकाराने घेतला आहे.
त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग केले आहे.या निर्णयामुळे मुंबई मेट्रोच्या निर्णयात खरे तर मुख्यमंत्र्यांनीच मिठाचा खडा टाकला असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. कांजूरला कारशेड नेले तरी आरे येथे काम करावेच लागणार आहे.जर तेथे बांधकाम करायचेच आहे, तर मग आरे येथे कारशेड नाही, हा हट्ट का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कारडेपो आमच्यासाठी टीकेचा विषय नाही.आरेत काम सुरू करा, विजय आमचा की त्यांचा हे महत्त्वाचे नाही.मुंबईकर जिंकले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.नवीन लोकांना चांगले भविष्य आहे,त्यांनी थोडे वाचन केले पाहिजे.अभ्यास केला पाहिजे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.आपल्याच सरकारने दिलेल्या अहवालाचे वाचन केले पाहिजे.सौनिक समितीने स्पष्ट केले आहे की, ४.५ वर्षाचा विलंब आणि ५००० कोटींचा भूर्दंड हा कांजूरमार्गमुळे होणार आहे. आजच्या निर्णयाने राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे.अजूनही वेळ गेली नाही, राज्य सरकारने अहंकार सोडावा! आता सत्य स्वीकारून पुढे गेले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.