मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने कोरोनाचा धोका कमी झाल्यावर हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षापासून #सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी आहे,#कोविडचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने सावधगिरी बाळगून हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाला सांगितले. pic.twitter.com/xvh33tMiZo
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) August 26, 2021
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य देणे तसेच तमाशा फडाना मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.कोविड विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी गेल्या काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावे, राज्यातील तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावा,गाव- यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी उपस्थितांनी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना दिले.