कठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश गेला
रावसाहेब दानवे
मुंबई दि.२९ कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्या पीडीतेला न्याय मिळाला आहे. भविष्यात असे गुन्हे घडू नये यासाठी या कठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश दिला गेला आहे,अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.
दानवे म्हणाले की, कोपर्डी येथे गेल्या वर्षी ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली. या खटल्याचे कामकाज वेगाने व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष देऊन तपास व खटल्याच्या कामी पाठपुरावा केला. सरकारतर्फे विशेष नियुक्ती केलेल्या ॲड. उज्ज्वल निकम यांनी अत्यंत कौशल्याने बाजू मांडली. राज्यात वर्षभरात ठिकठिकाणी निघालेल्या मराठा मोर्चांमध्ये या घटनेबद्दल संताप व्यक्त झाला होता व न्यायाची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने आज तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे न्याय झाला आहे. आपण तपास यंत्रणा व ॲड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन करतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुन्हेगारांवरील आरोप शाबीत होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले असून राज्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण चांगले वाढले आहे असेही दानवे यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.