मुंबई नगरी टीम
पंढरपूर: येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेबरोबर आघाडी करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.मनसे यावेळी राष्ट्रवादीशी आघाडी करणार असून राष्ट्रवादीने मनसेला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे,अशा बातम्या जोरात होत्या.पण जयंत पाटील यांनी त्या चर्चांना पूर्णविराम सध्यातरी दिला आहे.
जयंत पाटील म्हणाले की,लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आठ ते दहा दिवसांत जाहीर होईल.मात्र आघाडीबाबत मनसेशी चर्चा झालेली नाही. यामुळे या चर्चा निकालात निघाल्या आहेत.मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वाढत्या जवळिकीमुळे या चर्चा रंगल्या होत्या.राज ठाकरे यांनी पवारांची घेतलेली मुलाखत,एकत्र विमान प्रवास आणि राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला पवार कुटुंबाची हजेरी यावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरू होत्या.
पाटील म्हणाले की,अण्णांच्या उपोषणास आमचा पाठिंबा नाही.त्यांनी ज्या मागण्या केल्या तो कायदा आम्ही केला.पण भाजप सरकारने त्याची अमलबजावणी केली नाही.आपल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येईल,ही भीती त्यांना वाटत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.अण्णांच्या आंदोलनामुळेच सरकारने माजी मुख्यमंत्र्यांना चौकशीच्या कक्षेत आणले,असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.