राणे यांनी निवडणूक लढवू नये, अन्यथा पराभवाची हॅटट्रिक
मुंबई नगरी टीम
सिंधुदुर्ग : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पुन्हा एकदा खासदार नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. खा. नारायण राणे यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढवू नये,अन्यथा पराभवाची हॅटट्रिक होईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग मध्ये पराभूत झालेला नेता पुन्हा निवडून येत नाही, या इतिहासाची आठवणही त्यांनी राणेंना करुन दिली असून, एकदा सिंधुदुर्गात आणि दुसऱ्यांदा वांद्रे मतदारसंघातून राणे पराभूत झाले आहेत. त्यांना पराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल, तर त्यांनी निवडणूक लढवू नये, असे केसरकर म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी खा. नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग मधून एकदा हरलं की तो कितीही मोठा नेता असला तरी पुन्हा निवडुन येत नाही हा सिंधुदुर्गाचा इतिहास आहे. त्यामुळे नारायण राणे यांना अशी रिस्क घेवू नये असा सल्ला त्यानी राणे यांना दिला आहे. खा. राणे हे मोठे नेते असून ते त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले असल्याने त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.विद्यमान आमदार वैभव नाईक हे तडफदार नेते आहेत. त्यांचा मतदारसंगात चांगला संपर्क असल्याने ते आगामी निवडणुकीत निवडुन येतील असेही केसरकर म्हणाले.
2014 मधील विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून नारायण राणेंचा पराभव झाला होता. नऊ हजार मतांच्या फरकाने राणे पराभूत झाले होते. शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्र्याच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीला राणे पुन्हा उभे राहिले. मात्र शिवसेनेच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला होता. आमदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा राणेंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.