सरकारला सत्तेची एवढी मस्ती कशासाठी : अजित पवार
मुंबई नगरी टीम
परभणी : धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवा पत्नी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ठिकाणी आंदोलन करतील म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवले जाते. हा सरकारचा कारभार ? …सत्तेची एवढी मस्ती…एवढा माज…कशासाठी असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी गंगाखेड येथील जाहीर सभेत सरकारला केला आणि सत्ता येते – जाते हेही लक्षात घ्या असा निर्वाणीचा इशाराही सरकारला दिला.
राज्यातील शिक्षकांनी आज आपले अवयव विकायला काढले आहेत हे काय चाललंय राज्यात असा सवाल करतानाच अशा घटनांची जबाबदारी कुणाची आहे. ही सरकारची जबाबदारी नाही का? असे सरकारला ठणकावून विचारले.या दळभद्री सरकारमुळे लोक महाराष्ट्रात जीव देवू लागले आहेत असं का करत आहेत याचा विचार सरकार करताना दिसत नाही असेही पवार म्हणाले.
या सरकारने सर्वाधिक अन्याय मराठवाडयावर केला आहे त्याचा विचार मराठवाड्यातील जनतेने करावा असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. अंमली पदार्थाचे सेवन महाराष्ट्रात वाढले आहे हे कशाचे द्योतक आहे तर वाढलेली बेरोजगारी आहे. डान्सबार बंदी आमच्या आबांनी केली होती परंतु या सरकारने हे डान्सबार पुन्हा सुरु केले. युवा पिढी बर्बाद करण्याचे काम केले जात आहे. मध्यंतरी या सरकारने घरपोच दारु देण्याचा निर्णय घेतला होता प्या आणि जा चंद्रावर अशी भावना सरकारची होती असेही पवार म्हणाले.रात्र वै-याची आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. परंतु सरकारचे जे काही चालले आहे. ते जनतेसमोर आणण्याची आमची जबाबदारी आहे असेही पवार यांनी सांगितले.
सरकार विरोधी कोण बोलेल त्याच्याविरोधात ‘ईडी’ चे लिंबू फिरवले जात असल्याचा उपरोधिक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांना लगावला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात लाव रे तो व्हिडिओ असा जोरदार हल्लाबोल केला होता म्हणूनच त्यांना ईडीची नोटीस बजावली होती असेही मुंडे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना ना कर्जमाफी, ना दुष्काळ अनुदान… आणि पीक विमा भरुनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीय असा आरोपही मुंडे यांनी केला. युपीएच्या सरकारच्या काळात कधी नीच राजकारण केले गेले नाही.परंतु सध्याचे सरकार नीचतेची पातळी गाठत आहे असेही ते म्हणाले. शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार आहेत. कोर्टाबद्दल आम्हाला आदर आहे परंतु काही नाही तरीसुद्धा अजित पवार यांच्यावर नजर ठेवली जातेय.मी पाच वर्षांत या सरकारला उघडं पाडलं आहे.२२ मंत्र्यांचे पुराव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली.परंतु या भ्रष्टाचाराचे खरेखोटे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका व्यासपीठावर यावे असे जाहीर आव्हान मुंडे यांनी दिले. माझ्यासारखे असंख्य पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तोपर्यंत या मातीतील राष्ट्रवादी कुणीही संपवू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी मांडली.