महाराष्ट्र क्रांती सेना विधानसभेच्या १०० जागा लढविणार

महाराष्ट्र क्रांती सेना  विधानसभेच्या १०० जागा  लढविणार

मुंबई नगरी टीम

 नवी मुंबई :  मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर रान उठवणारी महाराष्ट्र क्रांती सेना राज्यात विधानसभा निवडणुकित तुल्यबळ उमेदवार उभे करणार आहे. स्वबळावर १०० जागा लढवून सरकारला पक्षाची ताकद दाखविणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख सुरेशदादा पाटील यांनी नवी मुंबई येथील राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. यामुळे सत्ताधारी पक्षासमोर महाराष्ट्र क्रांती सेनेने मोठे आव्हान उभे केले आहे. मुंबई सह ठाणे पुणे व उर्वरित महाराष्ट्रात या जागा लढविण्यात येणार आहे .

यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांचाही समावेश आहे. मराठा आंदोलनात सक्रिय जवळपास ६० विविध संघटनांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. पक्षाला राजकीय बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, डबघाईला आलेल्या उद्योगांना पॅकेज, उद्योजकांना विजबिलात सवलत, बेरोजगारांना रोजगार अथवा बेरोजगार भत्ता, महिला सबलीकरणासाठी जिल्हानिहाय प्रशिक्षण केंद्र या मुद्द्यावर स्वबळावर १०० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्रांती सेनेची जनमानसातील पकड व पक्षाची ताकद बघता सरकार आम्हाला देत असलेली वागणूक व सरकारची भूमिका ही अन्यायकारक असून सरकारला विधानसभेत हिसका दाखवून देऊ आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण १० जागांवर महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार उभे करण्यात येतील. लोकसभेवेळी भाजप शिवसेना यांनी घटक पक्ष म्हणून आमच्या पक्षाला जवळ करून निवडणुकीतून माघार घ्यायला लावली आणि आता त्याची परतफेड म्हणून सरकारतर्फे विधानसभेवेळी विश्वासात घेतले जात नाही व पक्षाला दुर्लक्षित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने राज्यभर विविध प्रश्नांवर आंदोलने छेडण्यात आली. यामध्ये मराठा आरक्षण हा विषय प्रामुख्याने घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सर्व जातीधर्माला एकत्र घेऊन महाराष्ट्र क्रांती सेना काम करित असल्याने या विचारधारेने प्रेरित झालेल्या अनेक युवकांनी यामध्ये सहभाग घेतल्याने संघटनेची ताकद राज्यभर पसरली आहे. राज्यातील अनेक मातब्बर राजकीय नेत्यांसह, उद्योगपती, शिक्षणसम्राट पक्षाकडून लढण्यास इच्छुक उमेदवारांच्या क्षेत्रनिहाय मुलाखती घेण्यात येत आहेत,अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा.चंद्रकांत भराट यांनी दिली. यावेळी राज्य प्रवक्ते प्रणय सावंत, खजिनदार भरत पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामजीवन बोदंर,कार्याध्यक्ष मारुतराव कातकर, उस्मानाबाद जिल्हाप्रमुख जोतिबा पवार, बीड जिल्हाप्रमुख ऍड.गणेश करांडे, परभणी जिल्हाप्रमुख बाळासाहेब काळे, लातूर जिल्हाप्रमुख बालाजी भरे, मुंबई विभागीय संपर्क प्रमुख सुशांत पाटील, कोकण विभागीय प्रमुख विलास सावंत, ठाणे जिल्हाप्रमुख रवींद्र साळुंखे, सांगली जिल्हाप्रमुख विलास देसाई, सातारा जिल्हाप्रमुख भास्कर जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवमती सुनिता पाटील,जळगाव जिल्हाप्रमुख पी.एस.पाटील तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब पवार, धुळे  जिल्हाप्रमुख मनोहर पाटील, नंदुरबार जिल्हाप्रमुख सुनिल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous article१५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक !
Next articleभाजप सरकारच्या अनियोजनामुळेच आर्थिक विकास गडगडला