कोणताही भूखंड हडप केलेला नाही : विनोद तावडे

कोणताही भूखंड हडप केलेला नाही : विनोद तावडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात येईल असे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केले होते. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी कोणताही भूखंड हडप करण्यात आलेला नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 वाजपेयी यांचे स्मारक तयार करण्याबाबत दीनदयाळ उपाध्याय समितीने अर्ज केला होता. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी जे अर्ज करतील त्या सर्व अर्जांची छाननी मंत्रीमंडळ उपसमितीमार्फत केली जाणार आहे. मंत्रीमंडळ उपसमितीने दिलेल्या अहवालानंतरच कोणत्या ठिकाणी स्मारक करावयाचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक करण्यासाठी राज्य शासनासमोर सध्या तरी स्मारकासाठी ४ जागा डोळयासमोर आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर जवळील जागा, बालभवन येथील एक जागा आणि उपनगरातील दोन जागा डोळयासमोर आहेत. मात्र अदयाप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी भूखंड हडप केल्याची बातमी वस्तुस्तिथीदर्शक नाही त्यामुळे माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन  तावडे यांनी केले.

Previous articleचकमकफेम प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश
Next articleऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वावरील इच्छुकांसाठी मोठा निर्णय