फ्लॉप प्रवक्त्यांचे फ्लॉप आरोप : केशव उपाध्ये

फ्लॉप प्रवक्त्यांचे फ्लॉप आरोप : केशव उपाध्ये

मुंबई नगरी टीम

मुंबई : ८९ लाखांपैकी ५० टक्के शेतकर्‍यांनाच कर्जमाफी मिळाली असे म्हणणे म्हणणे म्हणजे ‘फ्लॉप प्रवक्त्यांनी केलेले फ्लॉप आरोप आहेत, अशी टीका भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. गेल्या ५ वर्षांत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून एकही प्रभावी आरोप सचिन सावंतांना करता आलेला नाही, त्यामुळे नैराश्येतून अशी टीका त्यांच्या हातून होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुळात ८९ लाख शेतक-यांचा आकडा कुठून आला, हे सचिन सावंतांनी समजून घेतले पाहिजे. शेतकरी खात्यांची ही संख्या राज्यस्तरिय बँकर्स समितीने दिलेली होती. त्यामुळे ती संख्या गृहित धरण्यात आली. त्यानंतर जेव्हा ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले, तेव्हा बँकांनीच सुमारे १५ लाख खाती बाद केली. काँग्रेसचे सरकार असते, तर त्यांनी बँकांच्या घशात रक्कम टाकून ते मोकळे झाले असते. पण, भाजपा सरकारने तसे केले नाही. खर्‍या गरजू शेतकर्‍यांनाच लाभ मिळेल, हे सुनिश्चित केले. कारण, हा पैसा जनतेचा आहे. याशिवाय, शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, आमदार, खासदार इत्यादी वर्गवारींना यातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यांचीही खाती या 89 लाखांमध्ये होती. त्यामुळे पात्र सर्व शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय, पात्र अखेरच्या शेतकर्‍याला लाभ देता यावा, यासाठी ही योजना सुरूच ठेवण्यात आली आहे. इतक्या गतीने शेतकर्‍यांच्या खात्यात पैसा जमा करणे आणि शिवाय, पुढेही संधी देत राहणे, हे केवळ भाजपा सरकारमुळेच शक्य झाले, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Previous articleराज्य सरकारची कर्जमाफी योजना फ्लॉप : सचिन सावंत
Next articleसमृद्धी महामार्गासारखाच राज्यात आणखी एक भूसंपादन घोटाळा !