पोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल

पोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांनी द्राक्षांच्या संत्र्याच्या बागा तोडून टाकल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतक-यांना बियाणे आणि खते दिली पाहिजे. आमचा पोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल असा इशाराही देतानाच बहुमत मिळूनही हे लोक सत्ता स्थापन करत नाही.शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याचे या लोकांना काहीही पडले नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान केले असून सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्यपालांकडे केल्याची माहिती दिली.राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीला जबाबदार असणा-या भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला.अवकाळी पावसामुळे शेतक-यांनी द्राक्षांच्या संत्र्याच्या बागा तोडून टाकल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतक-यांना बियाणे आणि खते दिली पाहिजे. आमचा पोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल असा इशाराही देतानाच बहुमत मिळूनही हे लोक सत्ता स्थापन करत नाही.शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याचे या लोकांना काहीही पडले नाही अशा शब्दात पवार यांची युतीचा समाचार घेतला.

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली.या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख,आमदार धीरज देशमुख, आमदार शरद रणपिसे, आमदार यशोमती ठाकुर, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार अनिकेत तटकरे यांचा समावेश होता.

शेतीचे आणि इतर जे नुकसान झाले याची माहिती संयुक्त पुरोगामी आघाडीच्यावतीने राज्यपालांना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करता सरकारने १० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली रक्कम अपुरी असून २५ हजार कोटीची रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणीही केल्याचे  पवार म्हणाले.नुकसानीचे अजून पंचनामे सुरू आहेत, ६ तारखेपर्यंत मुदत दिली आहे. ती आम्ही वाढवून मागितली आहे.सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात दीड कोटी एकरामध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनाला आणले आहे. शिवाय राज्यातला ७५० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांचे नुकसान झालं आहे. वादळामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याबाबतीत ही सरकारने विचार करावा आणि राज्यपालांनी याबाबतच्या सूचना कराव्यात असेही सांगितले असल्याचे पवार म्हणाले.मागच्या वेळी अतिवृष्टी झाली त्याची मदत अद्याप पीडितांना मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने सेल्फ ड्राफ्ट काढून मदत करावी असेही पवार यांनी सांगितले. शेतक-यांचे पिक कर्ज माफ करावे. वीज बील माफ करावे. शिवाय परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे. या परतीच्या व अवकाळी पावसाने कोणतेही पीक शिल्लक राहिलेली नाही. त्यासोबत पशुधन आणि घरांचेही नुकसान झालेले आहे. त्यासाठीची मदत मिळावी अशी मागणीही पवार यांनी केल्याचे सांगितले.

खाजगी कंपन्यांनी विम्याची नफेखोरी केली असून सरकारने ती मदत मिळवून दिली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.पुरातील बाधित लोकांसाठी ६८०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली होती. ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता दहा हजार कोटींची मदत कधी मिळणार असा सवालही  थोरात यांनी सरकारला केला.काळजीवाहू सरकार आहे पण सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असेही  थोरात म्हणाले.

Previous articleशेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढा
Next articleशिवसेना भाजपाला कौल दिल्याने त्यांनी सरकार स्थापन करावे