मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ; शिवसेना भूमिकेवर ठाम
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंधरा दिवसाचा अवधी उलटूनही राज्यातील सत्तेचा तिढा कायम असून,भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली मात्र त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.मातेश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे शिवसेना आमदारांनी भूमिका मांडली आहे. राज्याचे नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल अशी ठाम भूमिका शिवसेनेने केल्याने राज्यातील सत्तेचा तिढा वाढला आहे.तर भाजपाने सरकार बनविण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे त्यानंतर शिवसेना पुढील पाऊल उचलेल असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असून, आज भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतील.या भेटीत ते सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी शक्यता होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली.भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेवून सत्तापेचावर चर्चा केली.राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब लागत आहे. मात्र राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर पक्ष नेतृत्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितेल.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली.या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच शिवसेनेच्या भूमिकेमध्ये कसलाही बदल होणार नाही.या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णयाचे सर्वाधिकार दिले.मला स्वतःहून युती तोडायची नाही,युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळे गोडीने व्हायला हवे. भाजपाध्यचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांसोबत सत्तेचा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली.आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेने सावधगिरी बाळगत आपल्या सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे.मातोश्रीच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याने मातोश्रीला छावणीचेच स्वरुप आले होते.
भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेची भूमिका मांडली.सध्या राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीला जे जबाबदार आहेत त्याच्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.महाराष्ट्राला लवकरात लवकर स्थिर सरकार मिळावे आणि त्या सरकारला ताकद देण्याचे काम शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल अशी भावना आमदारांनी, प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असा दावा राऊत यांनी केला.सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करीत नाही. म्हणजेच ते संख्याबळ जमवू शकत नाही.आपण सरकार बनवू शकत नाही असे भाजपाने जाहीर करावे मग शिवसेना पुढील पाऊल उचलेले असे सांगतानाच शिवसेना आशेवर नाही तर आत्मविश्वासावर जगते असेही राऊत म्हणाले.शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या वक्तव्याचा खरपूस समाचार राऊत यांनी घेतला. मीही म्हणेल की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, गोड बातमी त्यांच्याकडे असते. ते किती नाती जोडतात आणि किती जागी गोड जेवण जेऊ घालतात मला ठाऊक नाही असा टोला त्यांनी लगावला. गेल्या वेळेची आणि आताची परिस्थिती वेगळी असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राज्यातील जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे.राज्यात लवकराच महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर लागत आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असे सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितेल.विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेले आहेत.तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. भाजपाला सर्वात जास्त १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. सत्तेचे समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या दोन मागण्यांमुळे शिवसेना आणि भाजपातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढला आहे.