अशोक चव्हाण डरपोक त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला

मुंबई नगरी टीम

मुंबई । अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली.कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला,असा घणाघात प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली झाली.या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड,यशोमती ठाकूर,विश्वजीत कदम,शिवाजीराव मोघे,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी खासदार हुसेन दलवाई आदी नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही,मल्लिकार्जून खऱगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह जोमाने लढा देत राहिल. अशोक चव्हाण दिल्लीत मलिकार्जून खरगे व इतर वरिष्ठ नेत्यांना भेटले, परवा बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली तरीही त्यांनी पक्ष सोडला. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर काय अन्याय केला ? की ईडीला घाबरून ते गेले ? याचे उत्तर जनतेला द्यावे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने काँग्रस पक्ष कमजोर होणार नाही. पक्ष विचारधारेनुसार काम करत असतो, पार्टी सोडणाऱ्यांना जनता स्विकारत नाही. काँग्रेस पक्ष आणखी जोमाने काम करेल व लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन करेल.भाजपने चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपात गेले, भाजपाच्या वॉशिंग मशिन मधून धुवून ते स्वच्छ झाले.अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळाच्या आरोप पंतप्रधान मोदींनीच केला होता, त्यांनाही सत्तेत सहभागी करुन घतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का ? असा सवाल करीत,महाराष्ट्र विकास आघाडी मजबूत आहे त्याला कमजोर करण्यासाठी भाजपा धडपड करत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही चर्चा केली असून मविआ मजबूत आहे व महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही,आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल.भाजपा अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही हे त्यांच्याच सर्वेक्षणात दिसत असल्याने फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची व पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली. असे असताना ते भाजपात गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपात गेले असावेत. परंतु जनता जागृत आहे, भाजपाला धडा शिकवेल. महाविकास आघाडी मजबूत असून विधानसभेला विजय मिळून मविआचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Previous articleभाजपात जाताच अशोक चव्हाणांनी आशिष शेलारांना केले काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष !
Next articleपार्थ पवार आणि बाबा सिद्दीकींना डावलले ….अजित पवारांकडून थेट प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी