राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी

राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत,राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आज जी प्रक्रिया सुरु झाली ती अगोदर होवू शकत होती असेही मलिक म्हणाले.भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे मात्र घोडेबाजार सुरु होवू नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करु शकतो असेही  मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत अशी माहितीही आमदार  मलिक यांनी दिली.

Previous articleभाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण ; बहुमत सिद्ध करणार का ?
Next articleसरकार स्थापन करण्यास भाजपा असमर्थ