फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन….वाट पहा !

फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन….वाट पहा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. हा विधानसभा निवडणुकीच्या काळात गाजलेला देवेंद्र फडणवीस यांचा संवाद आज पुन्हा विधानसभा सभागृहात गाजला.विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीय यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते पण त्याचे वेळापत्रक सांगितले नव्हते त्यामुळे मी पुन्हा येईन तुम्ही वाट पहा असे  म्हटले.यावेळी फडणवीस यांनी एक शेरही सभागृहाला ऐकवला.

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांचे कौतुक केले.मंत्री जयंत पाटील  फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना म्हणाले की,देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात म्हटले होते की मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन त्यानुसार ते सभागृहात आले मात्र कोणत्या बाकावर बसणार हे सांगितले नव्हते. आता ते आले आहेत आणि विरोधी बाकावर बसले आहेत. तर अभिनंदनपर भाषणाला उत्तर देतान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रसिद्ध झालेल्या संवादाचे समर्थन केले.ते म्हमाले की, मी पुन्हा येईन हे म्हटले होते.राज्यातील जनतेने मला पुन्हा आणले. मात्र लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत असतात. सर्वात जास्त जागा भाजपाला देवून जनतेने आम्हाला जनादेश दिला. मी पुन्हा येईन म्हणालो होतो पण वेळ सांगितली नव्हती. त्यामुळे वाट बघा असा सूचक इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला.”मेरा पानी उतरता देख,किनारे पर घर मत बना लेना,मैं समंदर हूं,लौटकर जरूर आऊंगा”असा शेर त्यांनी ऐकवला.

फडणवीसांच्या या शेर नंतर भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.भुजबळ साहेब इतके घाबरू नका. पुन्हा आलो तर तुमच्या सकट येईन. आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले, त्यानंतर अशक्य असे काहीही राहिलेले नाही.असेही फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र काही कारणाने ते दुरावले आहेत. कधीही आवाज द्या. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत.जनहिताच्या निर्णयासाठी आम्ही साथ देवू,पण जनतेच्या आकांक्षांची पूर्तता होत नसेल तर आसूडही ओढायला कमी करणार नाही असा त्यांनी इशारा दिला.

अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते यांच्या निवडीचा प्रस्ताव अध्यक्षांनी वाचून दाखवला व देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे जाहीर केले.आजचे हिंदुत्व आजही आहे. उद्याही राहील. जय श्रीराम म्हणायचे व शब्द पाळायचा नाही हे आम्हाला मान्य नाही. मी येथे येईन असे मी कधीही म्हणालो नव्हतो.परंतु मला यावे लागले.सातबारा कोरा करायची मागणी होत आहे.आपल्याला शेतक-यांना चिंतामुक्त करायचे आहे, कर्जमुक्त करायचे आहे असे अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री म्हणाले.मंत्री जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. विरोधी पक्षनेते म्हणूनही ते उत्तम काम करतील यात शंका नाही. तर पक्षाच्या विचारांना धरून नेहमीच कार्य करत आलेले फडणवीस एक चांगले विरोधी पक्षनेते म्हणून भाषणातून दिसतील अशी अपेक्षा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस हे विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाहीत, असे सांगतानाच शेतक-यांच्या प्रश्नांवर पंतप्रधानांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्यास त्यांनी सहकार्य करावे अशी सूचना केला. भाजपचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेला आम्ही सहकार्य करू, मात्र सत्तेतील इतर पक्षांच्याबाबात तसे नाही.फडणवीस यांनी पुन्हा खेळ पलटवावा यासाठी आपली कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रर्थना आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत ५ वर्ष चांगले काम करा अशा शुभेच्छा दिल्या.

Previous articleविधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले विरुद्ध किसन कथोरे
Next articleपंकजा मुंडे येत्या १२ डिसेंबरला मोठी घोषणा करणार ?