सत्तापिपासू भाजपा आता रक्तपिपासू झाली आहे : बाळासाहेब थोरात

सत्तापिपासू भाजपा आता रक्तपिपासू झाली आहे : बाळासाहेब थोरात

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थी तसेच शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांच्या पाठिमागे कोणाचे हात आहेत? हे स्पष्ट दिसत असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्ष आता रक्तपिपासू झाला आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जेएनयू हल्ला प्रकरणावर बोलताना थोरात म्हणाले की, सत्तेसाठी राक्षसी प्रवृत्ती असलेला भाजपा आता देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहे. हा लोकशाही व संविधानावर करण्यात आलेला हल्ला असून ही बाब गंभीर तसेच चिंताजनक आहे. रात्रीच्या अंधारात हल्ला करून भाजपा विद्यार्थ्यांचाही आवाज दाबण्याचा तसेच त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे. भाजप विद्यार्थी संघटनेच्या गुंडानी हा हल्ला केला त्यावेळी पोलीसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत असून सरकारच्या पाठिंब्याशिवाय असा हल्ला होणे शक्य नाही. काँग्रेस पक्ष अशा हिंसक कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही थोरात यांनी केली आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी अमानुष मारहाण केली होती. विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणे ही हुकूमशाही प्रवृत्तीच आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपाचा हा डाव असून यात त्यांना यश येणार नाही, असेही थोरात म्हणाले.

Previous articleजेएनयू सारखे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही
Next articleराज्यातील रस्त्यांची कामे ठरलेल्या वेळेत व्हायला हवीत : अशोक चव्हाण