मुंबई नगरी टीम
मुंबई: आज राज्यात आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर – वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो कोरोना मुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे.
राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३ हजार ८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३ हजार ३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार २९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५ हजार ९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.