कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ; रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज राज्यात दिवसभरात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली असून,राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली आहे. आजच्या दिवशी राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.

मुंबई मध्ये  कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२६ वर पोहचली आहे तर मृत्यूंची  संख्या ३४ आहे.पुणे शहर आणि ग्रामिण मध्ये रूग्णांची १४१ एवढी झाली आहे. तर मृत्यूंची संख्या ५ झाली आहे.ठाणे जिल्ह्यात रूग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे.मृत्यू ९ झाले आहेत.सांगलीत रूग्णांची संख्या २५ झाली आहे.अहमदनगर मध्ये २३, नागपूर मध्ये १७,औरंगाबाद मध्ये १०,लातूर मध्ये ८ एवढी रूग्णांची संख्या झाली आहे.बुलढाणा सातारा येथील रूग्णांची संख्या प्रत्येकी ५ झाली आहे.( बुलढाणा मध्ये एकाचा मृत्यू) यवतमाळ ४,उस्मानाबाद ३,कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक मध्ये प्रत्येकी २ एवढी रूग्णांची संख्या आहे.( जळगाव मध्ये एका रूग्णांचा मृत्यू), सिंधुदुर्ग,गोंदिया,वाशिम, हिंगोली, अमरावती  आणि जालन्यात प्रत्येकी एक रूग्ण असून अमरावती मधील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत.तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत.त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई  परिसरातील इअतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.अहमदनगर जिल्हयात ७१ तर बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ४१ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते.मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणा-या ८० वर्षीय पुरुषाचा  काल मृत्यू झाला.नवी मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते. मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका ९ महिन्याच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे)  मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला.

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी संध्याकाळी एका ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. महानगरपालिकेच्या बांद्रा येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता.राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ झाली आहे.

Previous article…आणि बीडकरांच्या मदतीला बारामतीकर धावले
Next articleसव्वा तीन लाख पीपीई कीटस्,मास्क,व्हेटीलेटर्सची केंद्राकडे मागणी