दहावी भूगोलचा पेपर घ्यायचा का रद्द करायचा; येत्या सोमवारी होणार निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला.सध्याची परिस्थिती पाहता भूगोलाचा पेपर केव्हा होईल यावरून संभ्रम असतानाच सध्या असलेल्या टाळेबंदीमुळे  विद्यार्थ्यांचा भूगोलाचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे या विषयाचा पेपर रद्द करावा अशी मागणी पालकांकडून होवू लागली आहे.  शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांनीही  अशी मागणी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली असल्याचे समजते.याबाबत येत्या सोमवारी शिक्षणमंत्री आणि अधिका-यांमध्ये चर्चा होणार असून,भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जावू शकतो असे सांगण्यात येते.

दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी  पालक आणि शिक्षण अधिका-यांकडून होवू लागली आहे. याबाबत काही अधिका-यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली असल्याचे समजते. येत्या सोमवारी विविध मंडळाचे अधिकारी शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय जवळ जवळ झाला असून  त्यावर येत्या सोमवारी शिक्कामोर्तब होईल,अशी चर्चा आहे.सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता भूगोलाचा पेपर घेणे अशक्य असून,अशा आपत्तीच्या किंवा नैसर्गिक अडचणीत पेपर रद्द करण्याचा निर्णय घेवून संबंधित विषयांचे गुण देता येवू शकतात असे मत एका शिक्षण अधिका-यांना व्यक्त केले.राज्यातील विविध भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, प्रत्येक दिवशी रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत परीक्षा घेण्याचा निर्णय जरी घेतला तर तो कसा अंमलात आणायचा हा मोठा प्रश्न शिक्षण विभागापुढे आहे.त्यामुळे सरकारने दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी,अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.तर भूगोल विषयांची परीक्षा घेऊ नये,तसेच हा विषय अंतिम निकालात ग्राह्य न धरता विद्यार्थ्यांना भूगोल विषयात सरासरी गुण द्यावे किंवा ५५० गुणांपैकी निकाल जाहीर करावा असेही मत काही शिक्षण तज्ञांनी मांडले आहे.

Previous articleदहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी मार्क  देणार ?  
Next articleराज्यातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवणार ?