मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाही अनेक ठिकाणच्या खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याने अनेक रूग्णांवर संकट आले आहे.यावर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी त्यांना आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांनो, तुम्हाला हात जोडतो…ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा. असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फार फरपट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोल्हापूर जिल्हयामधील अनेक खाजगी दवाखाने,मल्टीस्पेशालिटी दवाखाने यांनी कोरोना व्हायरसच्या भितीपोटी ओ.पी.डी. व इतर सेवा बंद केल्या आहेत किंवा पॅरामेडिकल स्टाफ येत नाहीत, अशी सबब सांगून सेवा बंद केल्या आहेत यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे बरोबर नाही, कोरोना सोडून अनेक आजार, व्याधी आहेत. त्यासाठी जायचे कोठे? खोकला,सर्दी, पडसे किंवा कोरोना लक्षणे असलेल्या रूग्णांनाही सरकारी हॉस्पीटलला पाठवावे,अशी सुचना शासकिय पातळीवर केली आहे. परंतु, कॅन्सर, हृदयविकार,मूत्रपिंड,डायबेटीज, पित्ताशय, हार्णिया, दातांचे रुग्ण,हाडांचे विकार,डोळ्यांचे आजार असलेल्या रूग्णांनी लॉकडाऊनच्या काळात जावयाचे कोठे?त्यांचे हालअपेष्टा पाहून मी अधिक अस्वस्थ होत आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत . यामध्ये प्रसूतीसाठी अवघडलेल्या भगिनी आणि लहान बाळांच्या व्यथा तर मन सुन्न करून टाकणाऱ्या आहेत. अशा संकट काळातच डॉक्टरांनो सेवा करून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. माझी हात जोडून विनती आहे की आपणास देवाने ही सेवा करण्याची संधी दिली आहे. ती आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे करत आला आहात . तुमचे आजचे वैभव याच लोकांच्या सहकार्याने उभे राहिले आहे.
तुमची मुले डॉक्टर झाली. जो आपण व्याप वाढविलेला आहे, त्या वैभवाला रुग्णांच्या सेवेमुळे सुंदरता लाभेल. घेतलेला वसा टाकू नका. मी गेली सातत्याने १५ वर्षांपासून धर्मादाय दवाखान्यामधून दर आठवड्याला १५ ते २० पेशंट नित्यनियमाने मुंबईला घेऊन जाऊन उपचार व शस्त्रक्रिया करून घेऊन आणत होतो.मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेकांना आर्थिक सहायतासाठी मदत करत होतो. कोरोनामुळे लॉकडाऊन पासून वाहतूक बंद झाली. दवाखान्याने तारखा दिल्या,ते पेशंट माझ्याकडे येतात त्यांच्या व्यथा त्यांचे होणारे हाल पाहिल्यानंतर मी निशब्द होतो . आज माझ्याकडे त्यांचे उत्तर नाही. त्यापैकी अनेक मुंबईमधील हॉस्पीटल कोरोना रोगाचा त्यांच्या स्टाफमध्ये फैलाव झाल्यामुळे शासनाने सिल केले आहेत. फक्त कोल्हापूरमधील मोठ्या खाजगी दवाखान्यामधून उपचार करून घेणे, एवढाच मार्ग आहे. तेवढी सेवा आपण करावी, एवढीच कळकळीची विनंती आहे. खाजगी दवाखान्याला जर शासकीय पातळीवर अडचणी असतील किंवा शासकीय पातळीवर अडचणी असतील, कोणत्या रोष्टीची आवश्यकता असलेस मी निश्चीत त्यामध्ये सहकार्य करीन. परंतू, आपली सेवा अखंडीत सुरू ठेवावी व समाजाचा दुवा घ्यावा, अशी विनती करतो. महात्मा_फुले_जिवनदायी_आरोग्य_योजना व #आयुष्यमान योजना, तसेच ईएसआय कामगार व इतर योजना या मिळवून देणेसाठी मी तुम्हाला सहकार्य करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.