राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे भासवलं जातय : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : पालघरमध्ये जे घडलं ते चांगलं घडलेलं नाही असे घडायला नको होते.पालघर मधील प्रकार गैरसमजातून घडल्यानंतर लगेचच राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे,मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली जात आहे. हे योग्य नसून, राजकारण करण्याची ही वेळ नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करतानाच,संकटाशी संघर्ष करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यात शिथीलता येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी नकारात्मक विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया असे जनतेला आवाहन त्यांनी केले. पवार यांनी पालघर येथे घडलेल्या घटनेचा उल्लेखही केला.गेल्या काही दिवसात राज्यात उदाहरणे घडली.काही नसताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे भासवलं जातंय.पालघर मध्ये जो प्रकार घडला त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची घोषणाही केली आहे. १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही तासातच राज्य सरकार व पोलिस यांनी खबरदारी घेतली. असा प्रकार गैरसमजातून घडल्यानंतर लगेचच राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी होते हे योग्य नाही ती ही वेळ नाही.कोरोनाचे संकटावर  मात करण्यासाठी एकजुटीने, एका विचाराने तोंड देण्याची गरज आहे. काही ठिकाणी संघर्ष असतो तो करायचा त्यावेळी करू परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. आज या संकटाशी संघर्ष करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यात शिथीलता येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही पवार यांनी केले.

अमेरिकेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजार ६८३ इतकी आहे तर इटलीत २३ हजार ६००, स्पेनमध्ये २० हजार ८५२, फ्रान्समध्ये १९ हजार ७१८ आहे. या देशांचे आकारमान महाराष्ट्राच्या जवळपास आहे मात्र महाराष्ट्रातील मृत्यूमुखी संख्या ही चिंतनीय आहे. भारताची लोकसंख्या सर्वांना माहित आहे. परंतु कोरोनाने मृत्यू ५९० आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर २२३ असून देशाच्या तुलनेत जास्त आहे. इटलीपेक्षा  महाराष्ट्रात २२३ मृत्यूदर आहे. हा आकडा धक्कादायक आहे असेही पवार म्हणाले.मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण,डोंबिवली या शहरात कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे सांगतानाच दोन व्यक्तींमधील अंतर ठेवण्याची सूचना पाळत नसल्याने देशामध्ये महाराष्ट्राची गोष्ट चिंतनीय आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. यातून बाहेर पडायचा विचार करायला हवा असेही पवार यांनी सांगितले.

लातूरचा भूकंप, मुंबईची दंगल, बॉम्बस्फोट असो.या सगळ्या कालखंडात प्रशासन यंत्रणेने परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी अक्षरशः काही तास सुध्दा लावले नाहीत. हे कर्तृत्व महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यांनी यापूर्वी दाखवले आहे हा इतिहास आहे आणि त्यामुळे या सगळ्यांचा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहुया असे आवाहन पवार  जनतेला केले.रमजानचा महिना सुरू होत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरातच नमाज आणि रोजा सोडवावा. सरकारने नमाज बाहेर पडायला परवानगी दिलेली नाही. तुम्ही जसे देशाला योगदान देत आहात तसे योगदान यावेळी घरातच नमाज अदा करुन आणि रोजा सोडून द्यावे अशी विनंती पवार यांनी मुस्लिम बांधवांना केली आहे.

Previous articleखूशखबर : …. तर राज्यातील वाईन शॉप सुरू होणार
Next articleजागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवायचा असेल तर बेजबाबदारपणे वागू नका