काँग्रेसकडून मोदींना उमेदवारी;विधान परिषद निवडणूकीत चूरस

मुंबई नगरी टीम    

मुंबई : विधान परिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्याने या निवडणूकीत मोठी चूरस निर्माण झाली आहे.काँग्रेस प्रदेश सचिव राजेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही वेळेतच काँग्रेसकडून दुस-या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.दुस-या जागेसाठी काँग्रेसने बीड जिल्ह्याचे अध्यक्ष  राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही.राष्ट्रवादीने दोन जागी उमेदवार दिल्यास या निवडणूकीत मोठी चूरस बघायला मिळण्याची शक्यता आहे.

येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी भाजपकडून भाजपने नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर आज काँग्रेसकडून दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश सचिव राजेश राठोड आणि बीड जिल्ह्याचे अध्यक्ष  राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.एका जागेवर विजयी होण्याकरीता २९ मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार भाजप ४, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी २ तर काँग्रेस लढवेल असा अदाज व्यक्त केला जात होता.परंतु आज काँग्रेसने दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून मोठी चूरस निर्माण केली आहे.राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची चर्चा आहे मात्र त्यांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणता निर्णय घेतात यावर या निवडणूकीची गणिते अवलंबून आहेत.

सध्या विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत.तर त्यांना ७ आमदारांचा पाठिंबा आहे.संख्याबळा पेक्षा आम्हाला १० अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने करून भाजपचा चौथा उमेदवार सहज विजयी होईल असेही त्यांनी सांगितले.तर महाविकास आघाडीचे असणारे संख्याबळ,घटक पक्षांचे आणि अपक्ष आमदारांच्या  जोरावर महाराष्ट्र विकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी होतील असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे.काँग्रेस प्रदेश सचिव राजेश राठोड आणि बीड जिल्ह्याचे अध्यक्ष  राजकिशोर उर्फ पापा मोदी हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी तारिख आहे तर १४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार का हे स्पष्ट होईल.

सध्या विधानसभेत असणारे  पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

Previous articleवाचा : सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा पण कोणाला करता येणार प्रवास
Next articleकोरोनाच्या लढाईस यश… पुन्हा लढण्यास सज्ज : जितेंद्र आव्हाड