या कारणास्तव राजू शेट्टींनी नाकारली आमदारकीची ऑफर

मुंबई नगरी टीम

मुंबई :दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेवून राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज आमदारकीची ऑफर नाकारली आहे.शेट्टी यांच्या संघटनेच्या काही पदाधिका-यांनी शेट्टी यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली आहे. या १२ जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नावांची शिफारस करण्यात येणार आहे.आघाडीचा घटक पक्ष असणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेवून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीची ऑफर दिली होती. त्यानुसार शेट्टी यांनी दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची  बारामतीत भेट घेवून ही ऑफर स्वीकारली होती.मात्र शेट्टी यांच्या या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उलटसुलट चर्चांना सुरूवात झाल्याने अखेर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली आमदारकीची ऑफर नाकारली आहे.खुद्द राजू शेट्टी यांनी आज आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहे. त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा,असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही,असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते.आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली,या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील  यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले होते असे राजू शेट्टी यांनी या पोस्ट मध्ये नमुद केले आहे.

या बैठकीत माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती,म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो.तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार यांना पक्षाचे सचिव महावीर अक्कोळे यांच्यासह  भेटलो व होकार कळवला. या भेटीनंतर आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे.आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच… शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असेही शेट्टी यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Previous articleराज्यात ५१ हजार ९२१ कोरोनाचे ॲक्टीव्ह रुग्ण
Next articleपरिसेविका अधिपरिचारिका व वर्ग-४ संवर्गातील एकूण २२६ पदे भरण्यास मान्यता