अनिल गोटेंचा गौप्यस्फोट : चंपा आणि टरबुज्याचे बारसे भाजपच्या “या” नेत्यांनी केले

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर दुसरा हल्लाबोल केला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे “चंपा” तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “टरबुज्या” असे बारसे कोणी केले याची पोलखोल करून भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे आमदार गोपिचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष असलेले आक्रमक नेते अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांची पोलखोल केली आहे.पडळकर यांनी पवार यांना“ कोरोना ” ची उपमा दिल्यानंतर खरे तर, भाजपच्या नेत्यांनी तातडीने खुलासा करणे आवश्यक होते.परंतु काही काळ भाजपच्या एकाही नेत्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे स्वत: पडळकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरु पाहत होते.परंतु जनमानसामधील तीव्र संतापाच्या झळा भाजप नेत्यांपर्यंत पोहचु लागताच भाजपने सारवा सारव सुरु केली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना “ चंपा ” म्हणतात यांचे त्यांना तीव्र दु:ख होत असल्याचे त्यांनी कुठलाही आड पडदा न ठेवता मोकळेपणे मांडले.चंद्रकांतदादांना हे माहित नसावे की, त्यांचे “ चंपा ” नावाचे बारसे स्वत: गिरीष महाजनांनी केले असा गौप्यस्फोट गोटे यांनी केला आहे. महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना अरे त्या “ चंपा ” ला फोन लाव असे त्यांनी सांगितले. भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आप आपसातील  स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले असेही गोटे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांतदादांच्या चंपा या बारशाचा गौप्यस्फोट केल्यानंतर गोटे यांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वळविला.देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेके नेते फडणवीसांना “ टरबुज्या ” म्हणायचे ! आता तर,तेच नामकरण श्रर्वश्रृत झाले. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय ? असा सवालही गोटे यांनी केला आहे. तसेही भाजपामध्ये स्वत:चे नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. नरेंद्र मोदींना “ नमो ” म्हणतात अमित शहांना “ मोटाभाई ” म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना “ चंपा ” म्हणत असावेत असा टोला लगावत, अर्थात माझे भोळे- भाबडे विचार आहेत.आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी “ पडळकर हे स्वत: स्पष्टीकरण देतील ” असे सांगितले गेल्या चार दिवसात अजुन तरी पडळकरांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. उलट पडकळरांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.हे कशाचे लक्षाण समजायचे ? फटाक्यांच्या माळा लावून त्यांचे स्वागत करीत आहेत. आरत्या ओवाळल्या जात आहेत. कोरोनामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला आहे दुधाचे भाव पडल्याने दुध स्वस्त झाले. दुधाच्या पडलेल्या भावाचा गैरफायदा घेऊन भाजपाचे कार्यकर्ते पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.

धनगर समाजातील काही तरूणांना हाताशी धरुन शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करुन धनगर समाजाला समस्त मराठा समाजा विरुध्द भडकविण्याचे उद्योग बेमालुमपणे सुरु आहे. भाजपाचा महाराष्ट्रातील छुपा अजेंडा राबविण्याचे काम शाखा शाखांमधुन कुजबूज आंदोलनाव्दारे सुरु आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा जोडीने कोरोनाचा आधार घेऊन हिंदु मुस्लिम समाज धर्मात असलेली धार्मिक तेढ व संघर्षाचा फायदा उठवत आपल्या हिन्दू मतांच्या गाठोड्याची बांधा बांधा सुरु केली आहे. तर,राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उचकवीत आहेत असा हल्लाबोलही गोटे यांनी केला आहे.पडळकरांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देतांना “ भावनेच्या भरात मी बोलून गेलो ” असे म्हटले. भावनेच्याभरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा “ पोटात होत तेच ओठात आले ”  असा अर्थ होतो. भाजपाचे प्रवक्ते आ. राम कदम प्रसार माध्यमांसमोर बोलतांना “ अनिल गोटे यांचे वय झाले ” असे म्हणाले.माझ्या वयाची त्यांना नेमकी काय अडचण निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? असे सांगत त्यांनी आ. कदम यांचाही समाचार घेतला आहे.फडणवीसांना मी महारोग म्हणालो. संतापाच्या भरात वैगरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. पत्रकात प्रसिध्दी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. “ महारोगी असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे असेही गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Previous articleराज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी
Next articleमोठा निर्णय : विद्युत नियामक आयोगाचा वीज कंपन्यांना दणका