वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे हिच्या खुन प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येईल तसेच हा खटला चालवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून जेष्ठ सरकारी अभियोक्ता अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.या अमानुष खून प्रकरणाबाबत भुजबळ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली असून सदर प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील  वैष्णवी गोरे या गरीब रिक्षाचालकाच्या मुलीचा नुकताच विवाह झालेला होता. विवाहानंतर श्रीमती गोरे ही मंठा येथे माहेरी आली असता गावगुंड शेख अल्ताफ शेख बाबू याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर धारधार शस्राने हल्ला करून तिची अमानुष पद्धतीने हत्या केली.सदर आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी तिच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील जनतेची मागणी आहे, याबाबत लोकभावना अतिशय तीव्र असून या भागात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी साठी तसेच पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा याचबरोबर सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी छगन भुजबळ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली आहे.या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यासाठी भुजबळ यांनी जालना पोलीस अधिक्षक एस चैतन्य यांच्याशी संपर्क करून सदर प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासोबतच तपासासाठी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Previous articleपोलीस अधिका-यांच्या बदल्याबाबत गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवले
Next articleपरवापासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेस सुरू होणार