कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून बिनबुडाचे व तथ्यहीन आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई :काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईतून पाचशे कोटी रुपये राजस्थानसाठी जमा केले जात असल्याचा केलेला आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आहे,त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये ही कोरोनाचा वाढता प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आलेल्या अपयशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात येत आहेत असे जोरदार प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिले.

कधी भाजप सरकार पाडतंय, कधी राजस्थानला मदत करतोय अशा प्रकारची बेबुनियाद वक्तव्य करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याची शंका येतेय असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, प्रवक्ते सावंत हे जर असे  आरोप करीत असतील तर राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमच्या महाविकास आघाडी सरकारचा आहे त्यांनी याबददलची वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. जर आपण जनतेसमोर वस्तुस्थिती आणू न शकल्यास भाजपवर असे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असेल तर सचिन सावंत यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर माफी मागावी अशी मागणीही दरेकर यांनी केली.

राजकीय स्पर्धेत काही मिळवण्यासाठी अशा बिनबुडाच्या वक्तव्याचा उपयोग होईल व आपल्या पक्षांतर्गत वरिष्ठांना आपण खुश करू शकाल किंवा  विधान परिषदेच्या निवडणुकाजवळ येत आहेत यामध्ये आपल्या उमेदवारीचा विषय कदाचित यामुळे येऊ शकतो असा टोलाही दरेकर यांनी सावंत यांना लगावला.

Previous articleबकरी ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करा; गृहविभागाच्या सूचना जारी
Next articleपोलीस भरती :  २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा