पोलीस भरती :  २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीची प्रकिया येत्या डिसेंबर अखेर पूर्ण केली जाणार असून, २०१९ मध्ये पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अशा उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस शिपाई गट क संवर्गातील २०१९या भरती वर्षात रिक्त असलेली ५ हजार २९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती,पदोन्नती, राजीनामा मुळे  रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ६ हजार ७२६  पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२५३८ पदे भरण्यात येणार आहेत.ही भरती प्रक्रिया येत्या डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

२०१९ मधील पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याने २०१९ मध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे असेही देशमुख यांनी सांगितले.

Previous articleकोरोनाचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून बिनबुडाचे व तथ्यहीन आरोप
Next articleबदल्यांच्या फाईल्स क्लिअर होतात मग पोलीस डॉक्टरांच्या पगाराच्या का नाही !