परीक्षा घोटाळा प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले आहेत.तर जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली असल्याने
आरोग्य भरती,म्हाडा, टीईटी,पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. त्यामुळे या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले तुकाराम सुपेकडे आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले आहेत.म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढले.
आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत.
म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत असल्याने या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. असे सांगतानाच,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

Previous articleकोरोनाकाळात पंतप्रधान कुठे गायब होते ? नाना पटोले यांचा अमित शहांना सवाल
Next articleमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन