“घरी रहा, सुरक्षित रहा” या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर पडावे

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम असतानाच,देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर घरी रहा, सुरक्षित रहा या मानसिकतेतून बाहेर पडून खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले आहे.

गेल्या चार महिन्यापासून राज्यावर घोंगावणारे कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम आहे.तर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण या ७ दिवसांच्या ओनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन करताना,देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे त्यांनी सांगितले.करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे.या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. सोक्रेटस,प्लेटो,कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या  वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे त्यांनी यावेळी सांगितले.भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांचा थोर वारसा लाभला आहे, त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

Previous articleवाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान
Next articleदुधाला दर द्या… शेतकऱ्यांना न्याय द्या..अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन