‘उद्धवा अजब तुझे सरकार’ महाविकास आघाडीतील घटक पक्षाची सरकारवर टीका

मुंबई नगरी टीम

बारामती : दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बारामतीत मोर्चा काढला होता. यावेळी कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन राजू शेट्टी यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे गुन्हे दाखल केले तरी आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तर ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, असे ट्वीट करत त्यांनी सरकावर टीका केली आहे.

मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल  करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतक-याने दुधाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? उद्धवा अजब तुझे सरकार!, असे ट्वीट राजू शेट्टी यांनी केले आहे. यासह राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट करत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे पोलिसांना वाटले नाही. पण, परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचे ते करावे, सरकारला जे काय करायचे ते करावे. अजूनही सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार”.

Previous articleराज्यातील शाळा  केव्हा सुरू होणार ! शिक्षणमंत्र्यांनी दिली ही माहिती
Next articleजेईई,नीट परीक्षा हवी की जीव वाचवायचा ? आव्हाडांनी घेतला ऑनलाईन पोल