मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील गोरगरीब रूग्णांसाठी झटणारे राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.बुधवारी त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका पाठोपाठ एक मंत्र्यांना होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे ठाकरे सरकारची चिंतेत अधिक वाढली आहे.
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यामातून राज्यातील गोरगरीब रूग्णाच्या मदतीला धावून जाणारे आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.शिंदे यांनी ट्विटरवर माहिती देत म्हटले की,”काल माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे.गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी”, अशी विनंती मंत्री शिंदे यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून नगरविकास खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. राज्यातील विविध भागातील गोरगरीब रूग्णांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यामातून त्यांनी अनेक गरजू रूग्णांना मोलाची मदत केली आहे.कोरोनाच्या संकट काळात राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.गडचिरोली सारख्या दुर्गम भागातही त्यांनी आवश्यक सेवा पुरविण्याचे काम केले.तर कार्यकर्त्यांच्या चौकशीसाठी स्वत: पीपीई किट घालून कोविड सेंटर मध्ये जाताना राज्यातील जनतेने पाहिले आहे.रूग्णांसाठी दिवसरात्र झटणा-या शिंदे यांना अखेर कोरोनाची लागण झाली आहे.त्यांची प्रकृती स्थीर असून,ठाण्यातील ज्यूपिटर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात २१ हजार २९ रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार ४७६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, कोरोनाचा विळखा हा सरकारमधील मंत्र्यांना देखील बसत आहे.कोरोनाची लागण झालेले काही मंत्री त्यातून बरे झाले आहेत. तर काहींची झुंज अद्यापही सुरू आहे.