मुंबई आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात त्याच्या हत्येचा दावा फेटाळणारा अहवाल एम्सच्या विशेष पथकाने सादर केला आहे.त्यानुसार सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेनेसह अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोटयांचे पितळ उघडे पडले असे म्हणत टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल चढवला आहे.तर या प्रकरणात पोलीस, नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असेही महापौरांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत महापौरांनी टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांतसिंह प्रकरणात करण्यात आले. मुंबई पोलीस, महानगरपालिका,मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले होते.मात्र एम्सच्या अहवालामुळे खोटयांचे पितळ उघडे पडले आहे. शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवाल एम्सने दिला आहे. त्यामुळे लोकांचा आता मनपावरचा विश्वास वाढला असल्याचे देखील महापौर म्हणाल्या.

मुंबई,शिवसेना, आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले. मात्र आमचा यंत्रणांवर विश्वास आहे.परंतु या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे. आरोग्य सेवा पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.दरम्यान, एम्सच्या अहवालानंतर या प्रकरणाला आणखी नवा ट्विस्ट आल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Previous articleमुंबईतील लोकल केव्हा सुरू होणार ? ; रेल्वेमंत्र्यांनी केला मोठा खुलासा
Next articleसंजय राऊतांची रामदास आठवलेंवर घणाघाती टीका