स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्षे निघून जातील; संजय राऊतांचा दानवेंना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार यावर भाजप नेते वारंवार भविष्यवाणी करताना दिसतात. केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार असेल, असा दावा केला आहे. यावर शिवसेना खासदर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्षे निघून जातील, असा जोरदार टोला लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी हे सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावर अधिक बोलताना ते म्हणाले, एक वर्ष या सरकारला झाले आहे, पुढील चार वर्षही हे पूर्ण करेल. निराशा झाल्याने आणि सर्व प्रयत्न फसल्यानेच विरोधी पक्षातील नेते अशी विधाने करीत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. तसेच तीन दिवसांचे जे सरकार केले होते त्याची आज पुण्यतिथी असल्याचे म्हणत त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर पुन्हा निशाणा साधला. तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी आहे. आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार योग्य काम करत आहे. महाविकास आघाडी हे देशातील मजबूत आणि स्थिर सरकार असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, सर्व जुळवाजुळव झाली असून येत्या २ महिन्यांत आपले सरकार येणार आहे, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक प्रचारावेळी त्यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले आहे.

Previous articleमहाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नसल्यानेच ईडीची कारवाई ; शरद पवारांचे टीकास्त्र
Next articleकोरोना संकटात आंदोलन करणा-या राजकीय पक्षांना समज द्या : मुख्यमंत्री ठाकरे