सरकारचा दणका:भाजप नेत्यांची सुरक्षा केली कमी;फडणवीसांची बुलेटप्रुफ गाडी काढली

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. त्याच बरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे,माजी मुख्यमंत्री नारायण राणे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी भाजप नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे.

तीन दिवसांपूर्वी सुरक्षा आढावा समितीची बैठक झाली.या समितीने काही जणांची सुरक्षा कमी केली तर काही जणांची वाढवली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात आला आहे.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती.ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे.दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे.

माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय सुरक्षा देण्यात आली आहे. माजी मंत्री आशिष शेलार आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा होती. त्यात कपात करून आता त्यांना वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल,अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.

मुनगंटीवार, बडोलेंची सुरक्षा काढली

अंबरीशराव अत्राम,चंद्रकांत पाटील.सुधीर मुनगंटीवार,नारायण राणे,रावसाहेब दानवे,राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड,मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस,कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह,वायप्लस,वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात  केल्याने आता त्यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे.

सुरक्षा कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीचा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.उपाध्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाआघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोरोना काळात व त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते. त्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले.राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील,असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Previous articleराज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांची दिली महत्त्वाची माहिती
Next articleशरद पवारांनी केला गृहमंत्र्यांना फोन,म्हणाले.. माझी सुरक्षा कमी करा