जयंत पाटील चंद्रकांतदादांना म्हणाले ..हा तर “आयत्या बिळावर नागोबा”

मुंबई नगरी टीम

  • शरद पवारांची मापं काढणे बंद करावे
  • चंद्रकांत पाटलांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडलीय
  • कोथरूडमधून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का

सांगली । ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर चुकीचं विधान करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधी पक्षात आहात.जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणा-यांचे इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला आहे.चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अशी घणाघाती टीकाही पाटील यांनी केली आहे.

Previous articleवनमंत्री संजय राठोड यांच्यावरील कारवाई संदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Next articleविधानसभा अध्यक्षपदाबाबत कॅबिनेटमंत्री के.सी.पाडवी यांनी केले मोठे वक्तव्य