लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे

मुंबई नगरी टीम

  • उपाहारगृह,हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होतांना दिसत नाही
  • जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा
  • नियम पाळत नसतील तर हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द करा

मुंबई । गेल्या चार दिवसांत राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा असे संबंधितांना आदेश दिले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे,त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे आदेश त्यांनी दिले.कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा,एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत,निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या,जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेले वर्षभर कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरविली आहे,मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर असून,विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात.उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही.त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहीजे अशा सूचना त्यांनी दिल्या.

ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको,हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले.सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करण्यासोबतच गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा असेही त्यांनी सांगितले.

Previous articleकाळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय