विना मास्क फिरल्यास,लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास होणार कारवाई

मुंबई नगरी टीम

नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे
पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या इमारती करणार सील
विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार असून,नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.पाच पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱ्या इमारती सील करण्यात येणार असून,लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये ३०० मार्शल्स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करण्यात येवून,विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसून कोरोनाच्या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने सुरु असतानाच मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी आयुक्त चहल म्हणाले की, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्या तुलनेत आजही कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी वेगवेगळ्या सूचना केल्या.
त्या पुढीलप्रमाणे:

१) लक्षणे आढळत नसलेल्या बाधित (असिम्प्टोमॅटिक) रुग्णांना घरी विलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात येते. अशा रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत. तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्सच्या माध्यमातून त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून ते घरी असल्याची खातरजमा करावी. बाधित व्यक्तिंची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्प्टोमॅटिक रुग्णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्णांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) करावे.

२) ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्यात येतील.

३) लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना,क्लब्न, नाईट क्लब्स, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तिंना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

४) लग्नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्या किमान ५ जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले असेल तर दंडात्मक कारवाई करुन लग्नाचे आयोजक,पालक तसेच संबंधित व्यवस्थापनावर देखील गुन्हे दाखल करावेत.

५) मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणाऱ्या तसेच सार्वजनिक जागी थुकणाऱ्या नागरिकांवर
कारवाई करण्यासाठी मुंबईत सध्या कार्यरत असलेल्या २,४०० मार्शल्सची संख्या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

६) मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे सेवांच्या गाड्यांमध्ये विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येकी लाईनवर १०० या रितीने एकूण ३०० मार्शल्स नेमून विनामारक प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी.

७) विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.

८) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व इमारती, कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार महानगरपालिकेच्या शिक्षकांची नियुक्ती करुन त्यांना विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येतील.

९) सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांच्या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्याबाबत लक्ष ठेवण्यात येईल. विना मास्क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्लंघन केल्यास तेथेही कारवाई करण्यात येईल.

१०) खेळाच्या मैदानांवर व उद्यानांमध्ये देखील विना मास्क आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

११) कोविड बाधित रुग्णांची संख्या अधिक असलेल्या विभागांमध्ये मिशन झिरोच्या धर्तीवर कार्यवाही सुरु करावी. ज्या विभागांमध्ये नवीन रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत, तेथे
एरिया मॅपिंग करुन, त्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त संख्येने चाचण्या करण्यात याव्यात. तसेच अशा परिसरांमध्ये प्रति रुग्णामागे किमान १५ नजीकच्या संपर्कातील व्यक्ती (हायरिस्क कॉन्टॅक्ट) शोधून त्यांना विलगीकरणात ठेवावे.

१२) झोपडपट्टी, अरुंद वस्ती, दाट वस्तींमध्ये बिगरशासकीय संस्थांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी करावी. फिरत्या दवाखान्यांच्या (मोबाईल व्हॅन) माध्यमातून रुग्ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्या कराव्यात.

१३) प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र आणि लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र २ असे दोन्ही संवर्गातील प्रत्येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.

१४) भव्य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर्स) मधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्णशय्या, ऑक्सिजन रुग्णशय्या यांची पुरेशी उपलब्धता ठेवावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.

१५) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतून कोविड रुग्ण, रुग्णशय्या व इतर आवश्यक माहिती दर तासाने संकलित करुन ती माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने अद्ययावत करावी.

१६) केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

Previous article‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’, फडणवीसांची नाना पटोलेंवर विखारी टीका
Next articleअमरावती,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही