पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही,लॉकडाऊन टाळण आपल्याच हाती : राजेश टोपेंचे भावनिक आवाहन

मुंबई नगरी टीम

  • लॉकडाऊन टाळण केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे
  • मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा
  • तेंव्हा चला तर हरवूया कोरोनाला,एकजुटीने,एकमताने

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केल्यानंतर सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुध्द लढा देत असलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.त्यांनी आज राज्यातील जनतेला एका पत्राद्वारे भानविक आवाहन करीत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे.गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका,ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न,जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्ये, विशेषतःडॉक्टर,नर्सेस,आरोग्यसेवक, पोलीस,स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो.मात्र अद्यापही कारोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुध्द लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणु माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच.

आपल्या सदभावना,प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे. समजदार, संवेदनशिल व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला.मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही.लॉकडाऊन टाळण केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, असे भावनिक आवाहन टोपे यांनी केले आहे.तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.शेवटी स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेंव्हा चला तर हरवूया कोरोनाला,एकजुटीने,एकमताने,एकनिर्धाराने. असे टोपे यांनी पत्रात म्हटले आहे.

Previous articleधक्कादायक : मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव,एकाच विभागातील ८ कर्मचारी पॉझिटीव्ह
Next articleराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शरद पवारांसह अनेक नेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय !