देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे खोटारडे,फडणवीसांना वसुलीचा दांडगा अनुभव

मुंबई नगरी टीम

मुंबई । गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गट दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला यातील किती हिस्सा किंवा वाटा आहे अशा टोला लगावला असताना त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे खोटारडे असून,वसुली कशी करतात,वसुलीतील वाटा किती असतो आणि त्याचे वाटप कसे केले जाते याचा दांडगा अनुभव असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल करताना,काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारख चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतात आणि राज्यातले नेते वेगळे बोलतायत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,असा टोला लगावत काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.वसुली कशी करतात,वसुलीतील वाटा किती असतो, आणि त्याचे वाटप कसे केले जाते,याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत.पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते,ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता,याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत,असे पटोले यांनी फडणवीस यांना सांगितले.

पटोले यांनी पोलीस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच न्यायाधीश असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत.सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत.फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात असा टोलाही त्यांनी लगावला.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले ? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमवीरसिंह यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकरणाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मी सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असे पटोले म्हणाले.मुळ मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जीलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीचा होता. या जेलिटीनच्या कांड्या कुठून आल्या याचा तपास सुरु असताना हिरेन मृत्यू प्रकरण आले. या प्रकरणाचा एटीएस उत्तम रितीने तपास करत असताना भाजपाने एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली. आता त्याला आणखी फाटे फोडले जात आहेत. वास्तविक पाहता जनता महागाईने होरपळून निघत आहे. शेतकरी आंदोलनावर ११० दिवसांनंतरही मोदी सरकार निर्णय घेत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा हा सर्व खटाटोप चालला आहे,असेही पटोले म्हणाले.

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या ? याचाही खुलासा झाला पाहिजे
Next articleवसुलीमधील काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा ? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल