लॉकडाऊन करायचा असेल तर अगोदर सर्वांच्या खात्यात ५ हजार जमा करा

संग्रहित छायाचित्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घरचा आहेर दिला असतानाच आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही सरकारवर निशाणा साधत,लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर राज्यातील जनतेच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रूपये जमा करावेत अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी राज्य सरकारला काही सवाल केले.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? ” महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषा लावला जातो, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का ? समोर खड्डा आहे हे कळत असून पुनः खड्यात जाण्याची इच्छा आहे का ? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करून दरेकर यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात,परीक्षा देणारे तरुण, छोटे व्यवसाय करणारे,तसेच कष्ट करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावेत,त्यांना ताळेबंदी सुसह्य करावी,तरच ताळेबंदी करावी अशी मागणी त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील लॉकडाऊनची आवश्यकता नाही, आवश्यकता असेल तर कष्टकऱ्यांच्या खात्यात ५ रुपये जमा करावेत, अशीच भूमिका घेतली आहे. त्यांनी अशीही टीका केली की,महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व राज्यसरकार जबाबदार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे.वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही असा इशाराही दरेकर यांनी दिला.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत.नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.त्यापूर्वी मी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, वेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्याना सुद्धा कल्पना दिली होती. परंतु सांगूनही हे सरकार, प्रशासन जागं होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरले. केंद्र सरकारने सर्वपरी राज्याला मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडले आहेत.राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कारण, सर्वसामान्य लोकांकडे, महाराष्ट्राकडे राज्याच्या सरकारचे लक्ष राहिलेले नाही, फक्त सत्ता टिकवणे हेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर मदत करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

Previous articleबांधकाम क्षेत्राला सरकारचा मोठा दिलासा : रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही
Next articleसर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होणार ? धार्मिक स्थळे, नाट्यगृह,मॉल बंद करणार