तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या : प्रविण दरेकरांचे सरकारला खुले आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । आम्ही रेमडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहोत,असे सरकारला वाटत असेल तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या,असे खुले आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले.संजय राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत भाजपाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, पण श्रेयासाठी हे सर्व घडवून आणले, अशा अर्थाचा आरोप केला होता,त्याबाबत दरेकर आज माध्यमांशी बोलत होते.

दरेकर म्हणाले की,आपण हा सर्व घटनाक्रम बघा,मी दमणला गेल्यानंतर मंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना फोन केला आणि त्यांना आश्वस्त केले की,देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून महाराष्ट्रासाठी या कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळू शकतात.त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललो, सार्वजनिक आरोग्य तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी बोललो,अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी आणि या विभागाच्या सचिवांशी बोललो, सरकारच्या सर्व प्रमुख लोकांशी बोललो. मंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यांनीच अनुकूलता दाखवली. मात्र, नंतर याबाबत राजकारण केले गेले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला राऊत यांनी आम्हाला वेळ घेऊन द्यावी. कारण, सव्वा वर्षात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना केवळ दोन वेळा बैठकीच्या निमित्ताने भेटले,ज्या गोष्टी सुचवल्या त्यामधील एकही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांच्याच सरकारमधील आरोग्य मंत्र्यांची ही खंत आहे की,त्यांनाही चर्चेसाठी वेळ मिळत नाही,त्यांना जे निर्णय अपेक्षित आहेत,ते त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचेच हे दुःख असल्यामुळे आणि आम्ही सरकारमधील सर्वांशी चर्चा, बैठका घेतल्या असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

संजय राऊत यांनी सामनामध्ये चितेचा उल्लेख केला आहे. त्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की,महाराष्ट्रातील जनता आज रोज चितेवर जाते आहे,त्या चितेची चिंता खरं तर राऊतांनी करायला हवी,दिल्लीच्या नाकात नळकांड्या घालण्यापेक्षा राज्यातील गोरगरीब लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन नाही, त्यासाठी काही तरी मेहनत करायला हवी. कदाचित राजकीय टीका करून त्यांना समाधान मिळेल, पण त्यामुळे कोरोनाग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा सल्लाही दरेकर यांनी राऊत याना दिला.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला जायला नको होते,त्यांनी तो साठा सरकारला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते,साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली आहे,असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, या सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी आहेत.साठा जर असेल तर तो जप्त करायला सरकारला कुणी अडवले आहे. माझ्याकडे पोलीस खात्याची प्रेस नोट आहे, डीसीपी (ऑपरेशन) यांनी काढलेली आहे.त्यामध्ये साठ्याचा कुठेही उल्लेख नाही,केवळ सर्वसाधारण चौकशीसाठी त्यांना आणण्यात आले होते, असे त्यात म्हटले आहे.

या मधूनही काही प्रश्न निर्माण होतात. एकाच कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी का आणले, बाकीच्या कंपन्यांना का आणले नाही, ६० हजार इंजेक्शनचा साठा आहे, असे जर मंत्र्यांचे म्हणणे असेल तर त्यांना जेलमध्ये टाका, कारवाई करा आणि तो साठा राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून द्या. या सरकारचा बोगसपणा उघड झालेला आहे. सरकारला मदत करायला तयार असताना सरकारचा इगो आणि अहंकार आडवा आला,आमच्यामार्फत इंजेक्शन येत नाहीत, देवेंद्र फडणवीस याना क्रेडिट मिळेल आणि आमची नाचक्की होईल, या भावनेतून हे सर्व राजकारण सरकार करीत आहे. थोरात यांना इंजेक्शनचे नाव देखील नीट घेता येत नाही,त्यांनी माहिती करून घ्यावी, चुकीचे इंजेक्शन राज्यात आले तर जनतेला भोगावे लागेल. ज्या ठिकाणी सरकार निष्प्रभ ठरते, औषधे आणू शकत नाही, जे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना अडवतात त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, रोज अनेक आमदार, खासदार पोलीस स्टेशनला जात असतात,विरोधी पक्ष नेते गेले तर यांच्या पोटात का दुखत आहे ? हे सरकार उघडे पडले आहे, वैफल्यातून ही वक्तव्ये येत आहेत. जेव्हढा वेळ केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे सरकार घालवत आहे, त्याऐवजी ५ मिनिटे मुख्यमंत्र्यांनी, आरोग्य किंवा अन्न व औषध मंत्र्यांनी किंवा संजय राऊत यांनी मीडियासमोर यावे आणि बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन किती आहेत, कुठे आहेत, कुणाशी लोकांनी संपर्क साधावा, हे एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली.

रेमडीसीविर इंजेक्शन साठा,विरोधी पक्षाने पोलीस स्टेशनला दिलेली भेट यासंदर्भात चौकशीचे संकेत सरकारमधील लोकांनी दिले असल्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, एकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा,परंतु, विषय समजावून न घेता ट्वीट केले जात आहे, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर पोलीस स्टेशनला गेले याची चौकशी सरकार करणार का ? साठा मिळाला असेल तर चौकशीला कुणी अडवले आहे ? आमची तीच विनंती आहे की, हा साठा लवकर जप्त करा, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि तो साठा जनतेला उपलब्ध करून द्या. पण सरकार उघड पडले आहे,त्यामुळे अशी भाषा सरकारकडून केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Previous articleराज्यात येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन ? मंत्र्यांनी दिले संकेत
Next articleब्रुक फार्मा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बालीश राजकारण थांबवावे