१ मे ते १३ जून पर्यंत शाळांना सुट्ट्या ; १४ जून पासून शाळा सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील विद्यार्थी सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे.या संकटात कर्मचारी वर्ग घरातूनच काम करत असतानाच राज्य सरकारने शिक्षकांनाही दिलासा दिला आहे.राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज शनिवार १ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू देण्याचा निर्णय घेण्यात आला असून,या सुट्ट्या ३ जून पर्यंत असणार आहे.तर १४ जून पासून पुन्हा शाळा सुरू करण्यात येणार आहे.

या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.पुढील शैक्षणिक वर्षा २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून रोजी शाळा सुरू करण्यात येतील, तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून रोजी शाळा सुरू होतील.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय-अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक,माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत,अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत.२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोरोनाच्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

Previous article१५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला; सध्या लागू असलेले निर्बंध कायम
Next articleसर्व काही केंद्रावर ढकलणार,मग तुम्ही काय करणार ? चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल