पंतप्रधान मोदी खरंच भावूक झाले होते की ठरवून कार्यक्रम केला होता ? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आढावा घेताना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाले होते.मात्र नेहमी अशा बैठका घेताना पंतप्रधान मोदी हे मास्क किंवा गमछा वापरतात मात्र त्याचदिवशी त्यांनी गमछा किंवा मास्क घातले नव्हते,त्यामुळे पंतप्रधान मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून कार्यक्रम केला होता असा सवाल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला असून,याची चर्चा विदेशातील माध्यमांत असतानाचा देशातील परिस्थितीतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घेतला.कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना या बैठकीत पंतप्रधान मोदी हे भावूक झाल्याचे पहायला मिळाले.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की ठरवून कार्यक्रम केला होता ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाच्या संकटात देशातील जनतेशी संवाद असो की,व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी हे गमछा किंवा मास्क वापरतात.मात्र त्याच दिवशी मोदी यांचे गमछा आणि मास्क हे दोन्हीही गायब होते.त्यामुळे हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा आरोप मलिक यांनी केला आहे.या बैठकीत मोदी यांनी मास्क किंवा गमछा का घातला नाही ? मोदी खरंच भावूक झाले होते की,हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असे प्रश्न देशातील जनता करीत आहे असेही यावेळी मलिक म्हणाले.

दरम्यान, भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागत आहे. अशा शब्दात मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डिलीट केलेले ट्वीट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. भाजपच्या या नीतीवर मलिक यांनी प्रहार केला आहे.ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचे ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी केले. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. याआधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डिलीट होतेय. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतायत म्हणजे अंतर्गत बोलण्याचा अधिकार नाही हे यातून सिद्ध झाले आहे असेही मलिक म्हणाले.

Previous articleरोहयोच्या कामावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ? प्रविण दरेकरांनी केली चौकशीची मागणी
Next articleआ.निलेश लंके शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून शोभतात :जयंत पाटलांनी केले कौतुक