एमपीएससीच्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार;अजित पवार यांची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याकारणाने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले.कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे ज्येष्ठनेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यातील तरूण स्वप्निल लोणकर याने केलेल्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले तर मुनगंटीवार यांनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे.भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल.लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल,असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्यसरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचे सांगितले. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित यांनी केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात एमपीएससीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहाला दिली.

 

 

Previous articleफडणवीसांचा गौप्यस्फोट : शिवसेनेशी कोणतेही शत्रुत्व नाही,केवळ वैचारिक मतभेद निर्माण झालेत !
Next articleभास्कर जाधवांना धक्काबुक्की करणा-या भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन