भास्कर जाधवांना धक्काबुक्की करणा-या भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन

मुंबई नगरी टीम

मुंबई । अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.तर विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे,अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना आज एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.पराग अळवणी ( विलेपार्ले), राम सातपुते ( माळशिरस), संजय कुटे ( जळगाव जामोद), आशिष शेलार ( वांद्रे पश्चिम), अभिमन्यू पवार( औसा), गिरीश महाजन ( जामनेर),अतुल भातखळकर ( कांदिवली), शिरीष पिंपळे ( मुर्तीजापूर), जयकुमार रावल ( सिंदखेड), योगेश सागर ( चारकोप), नारायण कुचे ( बदनापूर) आणि किर्तीकुमार भांगडिया या भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले.या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांना मुंबई आणि नागपूरात होणा-या वर्षभरातील अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही.विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून ठराव मांडला.भुजबळांच्या या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.त्यावर उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो.मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही ? असा सवाल भुजबळ यांनी केला असता त्यावर फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा फेटाळून भुजबळांना बोलण्यास सांगितले.त्यामुळे भाजपचे सदस्य आक्रमक झाले.यावेळी भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोरील जागेत जमा होवून जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला.एका आमदाराने अध्यक्षांच्या व्यासपीठावरील माईक ओढला.यावेळी भाजपच्या एका सदस्यांने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल तीन वेळा तहकूब करण्यात आले.

सभागृह तहकूब झाल्यानंतर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव हे बसले होते.उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव चर्चा करीत असताना त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे किमान ५० आमदार आले.त्यावेळी भास्कर जाधव यांनी फडणवीस यांना उपाध्यक्षांच्या शेजारी बसण्याची विनंती केली मात्र आक्रमक भाजपच्या आमदारांनी आपल्याला घेरून धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे जाधव यांनी सांगितले.यावेळी गोंधळ घालणा-या भाजपच्या आमदारांना आवरण्याची विनंती फडणवीस यांना केली मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केल्याचे जाघव यांनी सांगितले. या आमदारांचे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू सभागृहात मांडली.त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडताना अशी कारवाई करू नका,अशी विनंती केली.तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला.हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली.

Previous articleएमपीएससीच्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार;अजित पवार यांची घोषणा
Next articleओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे १२ आमदारांचे निलंबन