रेस्टॉरंट,डान्स बार,वाईन शॉप सुरू मात्र,देव दैवते कुलुपात का ? : दरेकर यांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत महाराष्ट्रातील देव दैवतांना कुलुपात बंद करून ठेवलं आहे, तर दुसरीकडे रेस्टॉरंट, डान्स बार, वाईन शॉप सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहेत? सरकारला सत्तेच्या लालसेपोटी आपल्या देव दैवतांचा विसर पडला आहे का ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

दरेकर म्हणाले की, राज्यत मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने सर्वसामान्यांकडून होत आहे. या संकटाच्या काळात लोकांना जर कुठे शांतता भेटत असेल तर ती धार्मिक स्थळांच्या ठिकाणी. परंतु ते आज शांततेची ठिकाणे कडया कुलूपांत बंद आहेत. मंदीराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद आहेत. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात रेस्टॉरंट,डान्स बार,वाईन शॉप सुरू आहेत.धार्मिक स्थळ सर्व सामान्यांसाठी का उघडली जात नाहीत ? याचे उत्तर राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला द्यावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात लॉकडाउन करताना,एकाबाजूला लोकांचा जीव कोरोनामुळे धोक्यात असल्याचे राज्य सरकार सांगत असताना सर्वसामान्य लोकांवर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे तरी आता सर्वसामान्य लोकांना लॉकडाऊन परवडणार नसून कोणतेही कारण पुढे करत राज्य सरकारने लॉकडाउन करू नये अशी विनंती करताना दरेकर म्हणाले, ज्या आरोग्य व्यवस्था आहेत, त्या सक्षम करा. राज्याची परिस्थिति पूर्वपदावर आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक व्यवस्थाही कोलमडली आहे, त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केल्यास सर्वसामान्य जनता उपासमारी आणि आर्थिक टंचाईने मरेल अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केले.

Previous articleवाचा : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleआघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी;भाजपाचा हल्लाबोल